गांधीजी यांच्याइतकी राजमान्यता आणि लोकमान्यता देशात गेली अनेक दशके इतर कुठल्याही व्यक्तीला मिळालेली नाही.
गांधींना मानत नसलेली सत्ता आज देशात आणि राज्यात आली तरी त्यात कुठलाही बदल झाला नाही हे तर गांधींची अपरिहार्यता आणि थोरवीच अधोरेखित करते.
सत्तरच्या दशकात श्रीरामपूरला आमच्या शाळेत ज्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या होत त्यांत गांधीबाबा होते, पंडित नेहरु होते, टिळक आणि सावरकर होते, भगत सिंगसुद्धा असावेत.
टिळक पुण्यतिथीला १ ऑगस्टला हमखास वकृत्व स्पर्धा असायची.
शिवाजी महाराजांचा शाळेत फोटो असायचा, मात्र शिवजयंती वगैरे उत्सव साजरे होत नसत.
शाहू महाराज, जोतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचा तर कुठल्याही कार्यक्रमात नावाने उल्लेखसुद्धा नसायचा.
सत्तरच्या दशकाच्या अखेरीस आणि ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीस गोव्यात पणजीला पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणात तत्त्वज्ञान माझा खास विषय होता, त्यावेळी टिळकांचे `गीतारहस्य', मानवेंद्र नाथ रॉय आणि गांधीजी भारतीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात होते.
जोतिबा फुले किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तत्त्वज्ञानाच्या किंवा इतर कुठल्याही शाखांतल्या अभ्यासाचा भाग नव्हते.
तर तेव्हा महात्मा गांधी सगळीकडे होते, सरकारी कार्यालयांच्या भिंतीवरील फोटोंमध्ये, नोटांवर होते, आजही आहेत.
देशातील राजकीय आणि वैचारीक पार्श्वभूमीत एकदम टोकाचा बदल झाला तरी गांधीजीच्या या स्थानात काहीही बदल झालेला नाही.
गांधीजींऐवजी त्यांच्या इतर समकालीन व्यक्तींना अधिक थोर मानणाऱ्या लोकांनासुद्धा गांधीजींना एकदमच टाळता येत नाही, अशी आजची एकंदर स्थिती आहे.
दरम्यानच्या काळात गांधीजींच्या वाटेला खूप अवहेलना आल्या, त्यांच्यावर हल्ला करणे प्रतिष्ठेचे आणि सन्मानाचे ठरले तरी गांधीबाबा यांची सामान्य जनमानसातील जागा ढळलेली नाही.
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे गांधी आणि त्यांचा तो चरखा हे काँग्रेस पक्षाशी निगडीत होते. नंतरच्या काळात गांधीजी पुसटसे होत गेले.
हल्ली तर गांधीजी अगदी सत्ताधारी लोकांपासून सर्वांचेच आहेत, मोदीजींच्या `स्वच्छ भारत' योजनेत त्यांना मानाचे स्थान आहे.
त्याचप्रमाणे बापूजी अगदी कुणाकुणाचेच नाही असाही एक विरोधाभास दिसतो.
अनेक राष्ट्रपुरुष आणि महात्मे समाजातील विविध जातीधर्मांनी आपापसांत वाटून घेतले आहेत. गांधीजी मग कुणाच्याच वाट्याला आले नाहीत.
गांधीजी आता फक्त फोटोंपुरते आणि पुतळ्यांपुरते उरले आहेत.
अलीकडच्या काळात गांधींच्या पुतळ्यांत नवी भर पडली असेल असे वाटत नाही.
तर असे गांधीबाबा आता कुणाला हवे आहेत? कशाला हवे आहेत?
परवा पुण्यात गांधी भवनात झालेल्या तीन दिवसांच्या गांधी विचार साहित्य संमेलनात या प्रश्नांची उत्तरे मिळाली.
मुळात केवळ `गांधी विचार' या विषयावर साहित्य संमेलन होऊ शकते, यावरच काही दिवसांपूर्वी कुणाचा विश्वास बसला नसता.
याचे कारण साहित्यिक हे विद्रोही, ग्रामीण, विविध धर्माचे, प्रदेशाचे, नास्तिक, बोलीभाषांचे किंवा अखिल भारतीय असू शकतात,
त्यांच्या अस्मिता तिथे असतात, गांधी विचाराशी कुणाची बांधिलकी असू शकते का?
अन् या गांधी संमेलनाला कुणी येतील, गर्दी करतील अशी कल्पना करणे तर बाजूला राहिले.
काही ठराविक मंचावर जाणे आजही टाळले जाते, तुम्ही `मानो या ना मानो' वैचारीक अस्पृश्यता आजही अस्तित्वात आहेच.
मात्र महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे डॉ. कुमार सप्तर्षी आणि अन्वर राजन या द्वयींनी पुण्यात भरवलेल्या गांधी विचार साहित्य संमेलनाला अनपेक्षित, अविश्वसनीय प्रतिसाद मिळाला.
संपूर्ण राज्यभरातून अनेक मंडळी आवर्जून आली होती.
त्यामुळे संमेलनाची ठरलेली जागा ऐनवेळी अधिक प्रशस्त जागी बदलावी लागली.
मुख्य हॉलशेजारी अधिक खुर्च्या ठेवाव्या लागल्या आणि स्क्रीन्स ठेवावे लागले.
गांधी व्यक्तिमत्वाला आणि विचारसरणीला विरोध असणारी अनेक मंडळीसुद्धा या संमेलनात आवर्जून हजर राहिली, संवादात त्यांनी भाग घेतला हे विशेष.
पुस्तकांकडे वळायचे नाही हे ठरवलेले असतानासुद्धा माझी पुस्तकांची खरेदी झालीच.
तिथली मला आवडलेली एक बाब म्हणजे तिथे विक्रीसाठी असलेले बिनगळ्याचे पांढरे टी -शर्टस.
त्या टी -शर्टसवर चक्क गांधीजींचे चित्र आहे.
चे गाव्हेरा यांचो डोक्यावर कॅप आणि तोंडात चिरुट अशी छायाचित्रे असलेली टी शर्टस तरुणाईमध्ये गेली अनेक वर्षे लोकप्रिय आहेत.
चे गाव्हेरा आणि बापूजी तसे अगदी दोन विरुद्ध टोके.
गांधीजी आणि पांढरे टी शर्ट्स दोन्हीही माझे आवडते.
मी तरी हे टी - शर्ट्स वापरणार आहे

Comments

Popular posts from this blog

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction

Dnyanodaya monthly enters 175th year

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime