गांधीजी यांच्याइतकी राजमान्यता आणि लोकमान्यता देशात गेली अनेक दशके इतर कुठल्याही व्यक्तीला मिळालेली नाही. गांधींना मानत नसलेली सत्ता आज देशात आणि राज्यात आली तरी त्यात कुठलाही बदल झाला नाही हे तर गांधींची अपरिहार्यता आणि थोरवीच अधोरेखित करते. सत्तरच्या दशकात श्रीरामपूरला आमच्या शाळेत ज्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या होत त्यांत गांधीबाबा होते, पंडित नेहरु होते, टिळक आणि सावरकर होते, भगत सिंगसुद्धा असावेत. टिळक पुण्यतिथीला १ ऑगस्टला हमखास वकृत्व स्पर्धा असायची. शिवाजी महाराजांचा शाळेत फोटो असायचा, मात्र शिवजयंती वगैरे उत्सव साजरे होत नसत. शाहू महाराज, जोतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचा तर कुठल्याही कार्यक्रमात नावाने उल्लेखसुद्धा नसायचा. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस आणि ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीस गोव्यात पणजीला पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणात तत्त्वज्ञान माझा खास विषय होता, त्यावेळी टिळकांचे `गीतारहस्य', मानवेंद्र नाथ रॉय आणि गांधीजी भारतीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात होते. जोतिबा फुले किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तत्त्वज्ञानाच्या किंवा इतर कुठल्याही शाखांतल्या अभ्यासाचा ...