जोसेफ तुस्कानो

"अरे, कामिल तू?"
त्यांच्याभोवती असलेली गर्दी दूर झाल्यावर मी जवळ गेलो तेव्हा यांचे हे उद्गार ऐकून मला खूप भरुन आले. खूपच आनंद वाटला.
आम्हा दोघांची प्रत्यक्ष भेट त्याआधी पुण्यात केवळ एकदाच आणि तीसुद्धा खूप वर्षांपूर्वी झाली होती.
आज त्यांना भेटता येणार होते तरी आजकाल त्यांच्या प्रकृतीच्या वाढत्या तक्रारीमुळे ते कसे असतील, मला ओळख देतील की नाही याविषयी मी साशंक होतो.
त्यांच्या त्या पहिल्याच वाक्याने तो संभ्रम दूर झाला आणि मग आमच्या मनमोकळ्या गप्पा सुरु झाल्या.
"दिवसा शास्त्रज्ञ.. रात्री लेखक" असे जोसेफ तुस्कानो यांचे वर्णन केले जाते. ते मुळचे वसईतील गास या गावचे, मात्र नोकरीनिमित्त त्यांचे कायम वास्तव्य मुंबईत राहिले आहे.
फोनवर त्यांच्याशी माझे अनेकदा बोलणे झाले आहे आणि याआधी त्यांची प्रत्यक्ष भेट एकदाच पुणे कॅम्पातल्या क्वार्टर गेटच्या वायएमसीए सभागृहात एका कार्यक्रमात झाली होती.
तेव्हा माझे नाव सांगताच आनंदीत होऊन त्यांनी मला कडकडून गळाभेट दिली होती, ते आजही आठवते.
आज वयाची ७२ वर्षे पूर्ण केलेल्या जोसेफ तुस्कानो यांनी विविध विषयांवर शंभराहून अधिक - एकशेपंधरा – पुस्तके लिहिली असली तरी त्यांची प्रामुख्याने ओळख विज्ञानलेखक अशीच राहिली आहे.
याचे कारण भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवृत्तीपर्यंत त्यांनी नोकरी केली.
प्रत्यक्ष प्रयोगशाळेत काम करण्याचा त्यांचा अनुभव विज्ञान शाखेतील अनेक विषयांवर प्रमुख वृत्तपत्रांत वेळोवेळी लेखन करुन त्यांनी मराठी वाचकांपर्यंत नेला आहे.
मराठीत विज्ञान लेखन करणाऱ्या व्यक्तींची नावे फार नाहीत. लक्ष्मण लोंढे, जयंत नारळीकर, निरंजन घाटे आणि सुबोध जावडेकर अशी काही मोजकी नावे नजरेसमोर येतात.
आमच्या शालेय पाठ्यपुस्तकांत काही विज्ञानविषयक धडे असायचे, त्यांची नावे मला आता चटकन आठवत नाही. जोसेफ तुस्कानो यांनी विज्ञान विषयातील ही लेखनपरंपरा समृद्ध केली आहे हे नक्कीच.
कवि आणि सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टिन यांच्या सहयोग केअर सेंटरतर्फे वसईतील भुईगाव डोंगरी येथे २३ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या तेराव्या वसई साहित्य आणि कला महोत्सवात जोसेफ तुस्कानो यांचा सत्कार करण्यात आला.
तुस्कानो यांना मानपत्र आणि जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
आपल्या भाषणात सायमन मार्टिन यांनी जोसेफ तुस्कानो यांचे अडीच दशकांपूर्वी बहुचर्चित झालेल्या हरीत वसई आंदोलनातील अनोख्या योगदानाची माहिती दिली.
प्रयोगशाळेत कार्यरत असलेल्या जोसेफ तुस्कानो यांनी त्यावेळी वसई येथील पिण्याच्या पाण्याची गंभीर स्थितीबाबत पुरावे देऊन हे आंदोलन बळकट केले होते असे सायमन मार्टिन यांनी सांगितले.
`कामजीवनातले सौंदर्य', `आपले शास्त्रज्ञ; `किमयागार स्टीव्ह जॉब्स', ही जोसेफ तुस्कानो यांची काही गाजलेली पुस्तके.
तुस्कानो यांच्या विज्ञान, बाल साहित्य, काव्य वगैरे साहित्याबाबत अनेक मान्यवर लोकांनी प्रशंसा केली आहे, नारायण सुर्वे, शिरीष पै, कुमार केतकर, सिसिलिया कार्व्हालो, अनुपमा उजगरे, डॉ. विट्ठल प्रभू, सुभाष पाटील, केशव मेश्राम यांचा त्यात समावेश आहे .
"दिवसा शास्त्रज्ञ.. रात्री लेखक" या शिर्षकांचे बेसिल आणि सॅन्ड्रा रुमाव यांनी संपादित केलेले पुस्तक रिअल इमेज पब्लिकेशनने प्रसिद्ध केले आहे.
या पुस्तकात अनेक मान्यवरांनी तुस्कानो यांच्याविषयी आणि त्यांच्या लेखनाबाबत लिहिले आहे. या पुस्तकात मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे एक माजी अध्यक्ष फादर मायकल जी. यांनी तुस्कानो यांच्याबाबत दोन आठवणी सांगितल्या आहेत.
देशात आणिबाणीनंतर लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या आणि फादर मायकल जी. यांनी जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत भाग घेण्यास सुरुवात केली आणि झाले.
एका ख्रिस्ती धर्मगुरुने राजकारणात भाग घ्यावा याविरुद्ध वसईच्या बाळबोध ख्रिस्ती समाजात आग पडली. धर्माधिकाऱ्यांना पत्रे, मोर्चा आणि धमक्या सुरु झाल्या.
तेव्हा तुस्कानो यांनी फादर मायकल यांची मुलाखत घेऊन विचारले. ''ख्रिस्ती धर्मगुरुने राजकारणात भाग घ्यावा काय ?
फादरांनी `होय' म्हणून त्यांची बाजू मांडली.
तुस्कानो यांनी ही मुलाखत वसई धर्मप्रांताचे मुखपत्र असलेल्या `सुवार्ता' मासिकातच छापून आणली !
फादर मायकल जी. यांनी आणखी एक किस्सा सांगितला आहे. ते म्हणतात:
माझ्या अनेक पुरोगामी चळवळींना जोसेफचा पाठिंबा होता. एकदा एका अधिकृत व्रतस्थ (रिलिजियस) संस्थेच्या दोन सिस्टर्स संस्था सोडून बाहेर पडल्या. त्या आपल्या घरी जाऊन त्यांचे आयुष्य वाया जाऊ नये म्हणून मी त्यांना माझ्या आदिवासीविकास कामात सहभागी करुन घेतले.
त्यावेळी त्या भगिनींना चिथवणूक देऊन बहकविण्याचा आरोप माझ्यावर आला.
अशावेळी जोसेफनेच त्या आदिवासी केंद्राला प्रत्यक्ष भेट दिली आणि `लोकसत्ता’मध्ये एक लेख छापून आणला.
शीर्षक होते, 'दोन भगिनींची वेगळी वाट !''
सहयोग केंद्राच्या या महोत्सवात अभंगवाणी, पुस्तक प्रकाशन, बहुभाषिक कवी संमेलन , परिसंवाद असे इतर कार्यक्रम यावेळी झाले.
महोत्सवातील विविध सत्रांचे सुत्रसंचालन ख्रिस्तोफर रिबेलो आणि इमेल अल्मेडा वगैरेंनी केले.
पुणे, ठाणे , मुंबई. रायगड आणि पालघर जिल्हा येथील साहित्यिक आणि स्नेही मंडळी या साहित्य आणि कला महोत्सवात हजर होती.
( पूर्वप्रसिद्धी `निरोप्या' मासिक, एप्रिल २०२५)

Comments

Popular posts from this blog

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction

Dnyanodaya monthly enters 175th year

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime