श्रीरामपुरात आमची ती चाळ बहुजातिय आणि बहुधर्मिय होती

श्रीरामपुरात आम्ही राहायचो ती चाळ बहुजातिय आणि बहुधर्मिय होती. आमच्या कुडाच्या घराला एका भिंतीला लागून आणि समोर अशी दोन मुसलमान घरं होती. दुसऱ्या भिंतीला लागून मराठा जातीचं घर तर समोर ओळीने तीन घरं माळी कुटुंबाची होती. दुसऱ्या एका टोकाला आणखी एक मुसलमान घर होतं. थोड्या अंतरावर असलेल्या एकमजली इमारतीत इतर जातींतली आणि मारवाडी समाजाची घरं होती तर चाळीच्या अगदी शेवटच्या टोकाला दगडी बांधकामाची बैठी घरं होती. चार दशकांपूर्वी श्रीरामपूर सोडून मी गोव्याला गेलो तरी मला ती सगळी घरं, तिथली कुटुंबे आणि या सर्व शेजाऱ्यांचे आपापसांतले व्यवहार अजूनही ठळकपणे आठवतात.

लहानपणी मला आमच्या या शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या वेगळ्यापणाची जाणिव झाली ती त्या घरांतल्या बायांच्या कपाळांवरुन. माझी आई दररोज सकाळी अंघोळ झाल्यावर कुंकवाचा करंडा समोर ठेवून आधी कपाळावर गोल मेण लावायची आणि त्यानंतर त्या गोलावर कुंकू लावायची. मेणामुळे बहुधा कुंकू कपाळावर घट्ट राहायचे. समोरच्या माळी घरांतल्या सगळ्या बाया मात्र कपाळावर मध्यभागी कुंकवाची आडवी बारीकशी चिर लावायच्या, शेजारच्या एकमेव मराठा घरातली बाईसुद्धा माझ्या आईसारखेच गोल कुंकू लावायची. विधवा असलेल्या म्हाताऱ्या बायांच्या कपाळावर लालऐवजी काळे कुंकू असायचे, कपाळ मोकळे ठेवायची मुळी प्रथाच नव्हती.

आणि हो, चाळीतल्या तिन्ही मुसलमान घरांतल्या बायांच्या कपाळावर मात्र कुठल्याही रंगांचे वा आकाराचे कुंकू नसायचे, त्यामुळे त्यांची ओळख लगेच पटायची. या कुठल्याही मुसलमान घरांत बाया बुरखा कधीही घालत नसत.

आमच्या घरालागून असलेल्या या मुसलमान, माळी, मराठा आणि आमच्या स्वतःच्या घरातील बायांचा पोषाखाबाबत एक मात्र समान धागा होता, तो म्हणजे या सर्व बायांचा पदर कायम डोक्यावर ओढलेला असायचा. एखादे वेळेस पदर डोक्यावरुन ढळला आणि घरातला वडीलधारा पुरुष किंवा परपुरुष आला कि अगदी प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे पदर लगेच डोक्यावर ओढला जायचा.
शेजारच्या माडीवरच्या आणि दगडी भिंतींच्या घरांतल्या वरच्या जातींतल्या घरातल्या प्रौढ आणि म्हाताऱ्या बाया मात्र नऊवारी किंवा सहावारी लुगड्याचा पदर डोक्यावर न घेता खांद्यावरुन घ्यायच्या, तरुण बाया तर हा पदर या खांद्यावरून त्या खांद्यावर न घेता सरळ मागे पाठीवर टाकायच्या ! पलिकडच्या इमारतीत मारवाडी कुटुंबांतील बाया घरातले वडीलधारे पुरुष समोर आले कि चेहेऱ्यावर घुंगट ओढत असत.

अशा विशिष्ट दागिन्यांशिवाय शेजारच्या काही बायांच्या कपाळावर, गालांवर आणि हातांवर काही गोंदलेले असायचे, अशा गोंदण्यावरुनसुद्धा त्या बाईच्या जातींजमातींबाबत थोडाफार अंदाज यायचा. माझ्या आईच्या एका हातावर तर `सुभेदार' असे आईबाप लहानपणीच गेलेल्या तिच्या भाच्याचे नाव कोरलेले होते. लहानमोठ्या सुया, काळे दोरे, करंगोटे, बिब्वे आणि इतर काही औषधी वस्तू टोपलीत घेऊन दारोदारी येणाऱ्या वैदू आणि इतर भटक्या समाजाच्या बायांचा चेहरा अशा हिरव्यागार गोंदणांनी पूर्ण रंगलेला असायचा.

पुढे गोव्याला शिक्षणासाठी गेलो तेव्हा तेथे अनेक मित्रमैत्रिणींच्या उजव्या हाताच्या अंगठ्यापाशी क्रुसाचे चिन्ह गोंदवलेले दिसायचे. असे गोंदणे असले म्हणजे ती व्यक्ती गोवन कॅथोलिक आहे असे लक्षात यायचे.

मुसलमान घरांचा अपवाद सोडल्यास चाळीतल्या सगळ्या विवाहीत बायांच्या गळ्यात काळी पोत असलेले मंगळसूत्र असायचे. आमच्या घरातही माझ्या आईच्या आणि वहिनींच्याही गळ्यात मंगळसूत्र असायचे. या मंगळसुत्रांत सोन्याच्या एकदोनच पातळशा पाळी असत आणि बाकी काळे पिवळे चमकदार काचेचे मणी असत.

सणासुदीला, लग्नासारख्या मंगल कार्यक्रमाला अनेक बाया नाकात नक्षीदार नथी घालायच्या. मला आठवते, वयाने माझ्या आईहून लहान असलेली माझी मावशी - अनुसयामावशी - तर बाराही महिने नाकात नथ घालायची. बशीने चहा पिताना ती नाकातली नथ बाजूला सारायची, तिची ती करामत पाहत आम्ही लहान मुले खूप हसायचो. नाकात सोन्याची किंवा चांदीची मुरणी आणि कानांत सोन्याचे डुल हे इतर दागिने मुसलमान आणि इतरही सर्व बाया घालत असत.
बाईच्या बोलण्यात एकदा आलेला एक संदर्भ मात्र आजही मला आठवतो. श्रीरामपुरात स्थायिक होण्यासाठी नव्यानेच आल्यावर बाईने आपल्या काही दागिन्यांना कायमचा फाटा दिला होता. त्याकाळात पाणी भरण्यासाठी नगरपालिकेच्या नळावर साऱ्या बाया यायच्या. काही दिवसांनी दादांनी बाईला तिच्या दोन्ही हातांत खांद्यांपाशी असलेले चांदीचे वाळे काढून ठेवण्याची सूचना केली. अशा विशिष्ट दागिन्यांमुळे त्या बाईची जात इतरांना लगेच कळते असे दादांनी बाईच्या लक्षात आणून दिले होते.

श्रीरामपुरात मेनरोडवर सोनारलेनमध्ये असलेले आमचे `पारखे टेलर्स' हे दुकान शहरातल्या खूप चालणाऱ्या तिनचार दुकानांमध्ये होते. आसपासच्या खेड्यांपाड्यांतून, वाड्यांमधून लोक शिलाईसाठी आमच्या दुकानात येत असत. आमच्या या चाळीत तसे अगदी उघडपणे `खालच्या जातीचे' म्हणावे असे कुणीही नव्हते. याचे कारण म्हणजे पारखे टेलर यांचे आमचे घर सगळ्या चाळीत आणि त्यावेळी मर्यादित लोकसंख्या असलेल्या श्रीरामपूर शहरात एक ख्रिस्ती कुटुंब म्हणूनच ओळखले जायचे. `झाकली मूठ सव्वा लाखाची’ असा हा प्रकार होता. असे असले तरी आम्ही काय खातो याविषयी सगळ्या चाळीला कल्पना होती.

मात्र चाळीत आसपासच्या सर्व घरांतले लोक वशट खाणारे असल्याने त्यांच्यापेक्षाही अगदी वेगळ्या असलेल्या आमच्या खाद्यसंस्कृतीविषयी एक शेजारधर्म म्हणून कधीही बाऊ केला जात नसायचा वा कुणी नाकही मुरडत नसायचे. मांसाहारी पदार्थ शिजवताना, ओले आणि सुके मासे तळताना आणि भाजताना कुणाच्याही भावना दुखावल्या जात नसत.

असा वेगवेगळा पेहेराव करणाऱ्या, कुंकू लावणाऱ्या आणि न लावणाऱ्या, दागदागिन्यांचे तऱ्हेतऱ्हेचे प्रकार असणाऱ्या, वेगळी खाद्यसंस्कृती असलेल्या विविध जातींच्या आणि धर्माच्या या बाया वर्षांतून अनेकदा एकत्र यायच्या आणि मला खात्री आहे आजही नक्कीच अशाच प्रकारे येत असतील.

उन्हाळ्यात पूर्ण वर्षभर पुरेल इतक्या कुरडया, शेवया किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पापड करायचे असायचे. त्याकाळात कुटुंबातल्या व्यक्तींची संख्या जास्त असायची, पाहुण्यारावळ्यांसाठी, लेकीबाळींसाठी, शिक्षणासाठी बाहेरगावी राहणाऱ्या मुलांसाठी या पदार्थांची वर्षभराची बेगमी करावी लागायची. अशावेळी चाळीतल्या सर्वच महिला एकमेकींवर पूर्ण अवलंबून असत.

भल्या पहाटे कुरडया आणि शेवया करण्यासाठी पूर्वतयारी झाली की मग शेजारपाजारच्या बाया कंबराला पदर खोचून मदत करायला येत असत. त्यानंतर गप्पागोष्टी करत, एकमेकींची चेष्टा करत वर्षांसाठी त्यात्या घराचे पदार्थ बनत.

मला आठवते आमच्या घरी खास शेवया करण्यासाठी केलेले घडी करण्याजोगे चारपाच नक्षीदार लाकडी पाट होते. स्टुलावर बसून शेवयाचें पीठ या पाटांवर मळत सरासरा शेवया वळल्या जायच्या आणि त्याच वेगाने आम्ही मुले शेवयाचें ते बारीकसे सूत ताटांवर घेऊन लगेच सुकायला ठेवत असू. हा कार्यक्रम ऊन डोक्यावर येण्याआधीच आटपायचा.
आमच्या घरी म्हणजे मार्थाबाईच्या शेवया झाल्या कि मग शेजारच्या शांताबाईच्या कुरडया बनवल्या जायच्या आणि नंतर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या घरी हाच कार्यक्रम होत असे. आमच्या घरचे शेवयांचे पाट मग त्या घरी नेले जायचे, कुरडयांसाठी शेजारच्या घरांतले सोरे मागवले जायचे. बनवलेल्या शेवया आणि कुरडया उन्हात वाळवण्यासाठी काथ्यांनी विणवलेल्या लाकडी बाजा आसपासच्या घरांतून आणल्या जायच्या. पावसाची चाहूल लागण्याआधी म्हणजे मृग नक्षत्राच्या आगमनाआधी कुरडया,शेवया, पापड हे सर्व पदार्थ बनवले जायचे.

गोल कुंकू , कुंकवाची आडवी चिर असणाऱ्या आणि अजिबात कुंकू नसणाऱ्या, डोक्यावर पदर घेणाऱ्या, खांद्यावर पदर टाकणाऱ्या, गोंदण असणाऱ्या आणि नसणाऱ्या तसेच वेगळी खाद्य संस्कृती असणाऱ्या या सर्व महिला हे सर्व फरक विसरुन या कामासाठी अगदी एक व्हायच्या.

लगीनसराई सुरु झाल्यावर एखाद्या घरात लग्न असले कि पूर्ण चाळीत उत्साह पसरायचा. लग्नघरातल्या अंगणात मांडव पडला कि रंगीबेरंगी बांगड्यांचा संच घेऊन कासार यायचा, एखादवेळेस कासार बाई यायची. मग आसपासच्या प्रत्येक घरातल्या मुली आणि बाया आळीपाळीने कासारासमोर मांडी घालून बसायच्या. समोर बसलेल्या बाईचा हात हातात अलगद घेऊन मग तो कासार पुरुष किंवा बाई जुन्या बांगड्या हलकेच दाबून एकामागे एक असे करत कचकन मोडून टाकत आणि नव्या बांगड्यांसाठी जागा केली जाई.

अशाप्रकारे लग्नघराकडून लग्नाच्या निमित्ताने शेजारपाजारच्या सर्व महिलांना दोन्ही हातांत डझन किंवा अर्धा डझन हिरव्या बांगड्यांचा चुडा भरवला जाई. विशेष म्हणजे बांगड्यांबाबत या वेगवेगळ्या जातिधर्माच्या आणि संस्कृतीच्या महिलांमध्ये कुठलाही फरक नसे. लगीनसराईत अनेकदा या विविध जातींधर्मांच्या बायांच्या या बांगड्या अगदी हातांच्या कोपऱ्यांपर्यंत पोहोचायच्या.

हळदीच्या दिवशी मांडवात नवरदेवाला किंवा नवरीला हळद लावायला या शेजारणी पुन्हा जमायच्या. हळद लावलेल्या आणि कपाळाला मुंडाळ्या किंवा बाशिंग बांधलेल्या नवरदेवाला आणि नवरीला शेवया खाण्यासाठी बोलावले जायचे. `गडांगणेर' नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाला नवरदेव वा नवरीबरोबर करवले आणि करवल्या जात असतात. वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा लोकसंस्कृतीचा हा प्रकार महाराष्ट्रात ठराविक ठिकाणीच आढळतो. या गडांगणेरसाठी चाळीतल्या सगळ्या घरांत आमंत्रण असायचे, जातीधर्माचा अजिबात भेदभाव नसायचा.

अडीअडचणीच्या काळात ज्वारी-बाजरीचे आठवाभर किंवा पातेलेभर पीठ शेजाऱ्यांकडून उसनवारीवर आणले जायचे, मिठ-मिरच्यांसाठी ऐनवेळी, रात्री-अपरात्री शेजाऱ्यांच दार खटखवण्यास कुणाला कधी शरम वाटत नसे.

चाळीतल्या या अनेक घरांचे वेगवेगळे धार्मिक उत्सव असायचे आणि त्यात इतरांना आवर्जून सहभागी केले जायचे. दिवाळीला आमच्याकडे शेजाऱ्यांकडून फराळाची अनेक ताटे यायची आणि ख्रिसमसनिमित्त आमच्या घरांतून त्या सर्व घरांत करंज्या, लाडू, अनारशा वगैरे पदार्थांची ताटे पोहोचत असत . रमजान ईदला चाळीतल्या तिन्ही मुसलमान घरांतून इतर सर्व घरी गरमागरम गोड शिरकुर्मा पोहोचता व्हायचा.

बिनवेशींचे गाव अशी नव्यानेच वसलेल्या श्रीरामपूर शहराची ओळख आहे. इथला रामनवमी उत्सव म्हणजे सर्व शहरवासियांचा सण असायचा. रामनवमीची मेनरोडवर रात्री निघणारी मिरवणुक आणि रथावर सारखा इकडेतिकडे फिरत असणारा लांब शेपटीचा मारुती पाहायला लहानथोर मंडळींची गर्दी जमायची. मला आठवते वर्षानुवर्षे रामनवमी उत्सवाच्यावेळी या रथावर बसलेल्या हनुमानाची भुमिका करणाऱ्या या व्यक्तीवर स्थानिक दैनिकात एक लेखही छापून आला होता !

साठसत्तरच्या दशकांत श्रीरामपूरचा रामनवमी उत्सव संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात खूप प्रसिद्ध होता. नंतरच्या काळात शिर्डीतही रामनवमी उत्सव सुरु झाला आणि मग इथल्या उत्सवाची नवलाई कमी झाली.

रामनवमी उत्सवाच्या आगेमागेच भुयारी रस्त्याच्या वरुन गेलेल्या रेल्वेपुलाच्या पलिकडे असलेल्या दर्ग्याचा सण असायचा. तिथे भरणारा उरुस आणि कव्वालीचा कार्यक्रम शहरातील सगळ्यांचेच आकर्षण असायचा.

अलिकडच्या काळात क्रिकेटपटू झहिर खान यांच्यामुळेही श्रीरामपूर चर्चेत आले होते.
शेजाऱ्यांच्या किंवा परिसरातील इतर वेगळ्या जातिधर्माच्या लोकांच्या विशिष्ट पद्धतीचे कुंकू लावण्यावरुन किंवा न लावण्यावरुन, मंगळसूत्र अशा दागिन्यावरुन तसेच घुंघट, बुरखा किंवा हिजाब अशा पेहेरावावरुन, खाद्यसंस्कृती किंवा इतर रितीरिवाजांमुळे कधीही वाद, झगडा झाल्याचे आठवत नाही. उलट अडीअडचणीला हेच लोक पाठिशी उभे राहून आपला शेजारधर्म पाळत असल्याच्या माझ्या अनेक आठवणी आहेत, इतरांचाही असा अनुभव असेलच.

साठ- सत्तरच्या दशकांतील श्रीरामपूर शहरातील माझ्या बालपणीच्या या आठवणी. या प्रातिनिधिक स्वरुपाच्या आठवणी म्हणता येतील याचे कारण इतर गावांतील आणि शहरांतील अशाच स्वरुपाच्या आणि वेगळ्या काळातील आठवणी इतरांच्याही नक्की असतील.

आज शहरीकरणामुळे आणि बंद दरवाज्याच्या फ्लॅट संस्कृतीमुळे शेजारपण नाहिसे झाले आणि शेजारधर्मही हरवला आहे. त्यात आपल्यापैकी नसणाऱ्या लोकांकडे संशयाने, द्वेषाने पाहण्याच्या वृत्तीत वाढ होत आहेत. हिजाब घालण्यावरुन कर्नाटकात सुरु झालेला आणि आता देशभर पसरणारा वाद हे केवळ एक उदाहरण म्हणता येईल. हा वाद आणि असले इतर वाद हितसंबंधी लोकांकडून आणि संघटनांकडून मुद्दामहून स्वार्थी हेतूंनी काढले असले आणि चिघळवले जात असले तरी याचे सामाजिक आणि इतर दुष्परिणाम भयंकर असणार आहेत .

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction

A day at Mother Teresa’s Home for Destitutes