‘टिपंवणी’ : सामाजिक इतिहासाचा आणि धार्मिक, सांस्कृतिक स्थित्यंतराचा ऐवज
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
कामिल पारखे



पालघर जिल्ह्यातील वसई हे माझे एक आवडते सुट्टीचे ठिकाण. वर्षांतून किमान दोन-तीन दिवस माझा तेथे मुक्काम असतोच. याचे एक कारण म्हणजे माझ्याशी अत्यंत जवळचे, स्नेहाचे संबंध असलेली कुटुंबे तेथे आहेत. आणि दुसरे कारण म्हणजे वसईचे गोव्याशी अनेक बाबतीत असलेले साम्य. या दोन्ही किनारपट्टीवरील प्रदेशांमध्ये एकेकाळी पोर्तुगीजांच्या वसाहती होत्या. वसईतली नारळांची झाडे, अनेक गावांत अजूनही राहिलेली हिरवाई, फळझाडे आणि फुलझाडांमध्ये असलेली टुमदार घरे, अरुंद रस्त्यांच्या चौकाचौकांत असलेले क्रूस आणि या क्रुसांसमोर दररोज संध्याकाळी तेवणाऱ्या मेणबत्त्या, बाजारांत आणि रस्त्यांवर विक्रीला असलेली मासळी, यामुळे आपण क्षणभर गोव्यातच आहोत, असे मला अनेकदा वाटते.

गोव्याचे आणि वसईचे ख्रिस्ती लोक यांच्या संस्कृतीतही खूप साम्य आहे. सिसिलिया कार्व्हालो यांचे ‘टिपंवणी’ हे आत्मचरित्र वाचताना वसईच्या या आगळ्यावेगळ्या समाजजीवनात खोलवर डोकावण्याचा अनुभव आला.

कार्व्हालो या मराठी साहित्यक्षेत्रात एक कवयित्री आणि विविध विषयांवर संशोधनपूर्ण लिखाण करणाऱ्या प्रतिभावान साहित्यिक म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रभर होणाऱ्या अनेक सभासंमेलनांत\कार्यक्रमांत हजेरी लावत असल्याने आणि अनेक चळवळींत सहभाग असल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकांना परिचित आहे. ख्रिस्ती समाजाच्या मर्यादित वर्तुळाबाहेर मराठी सारस्वतात ज्यांना साहित्यिक तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून मान्यता आहे, अशा मोजक्या व्यक्तींमध्ये फादर फ्रान्सिस दिब्रिटो, सिसिलिया कार्व्हालो, अनुपमा उजगरे आणि गझलकार रमण रणदिवे यांचा समावेश होतो.

मात्र देशात आणि राज्यातही अल्पसंख्य असलेल्या ख्रिस्ती समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाबद्दल बहुसंख्य समाजाला माहिती नसते. मराठी साहित्याच्या सुरुवातीच्या इतिहासापासून ख्रिस्ती व्यक्तींनी अत्यंत मोलाचे साहित्यिक योगदान दिलेले असतानाही अशी परिस्थिती आहे. सतराव्या शतकातील ‘ख्रिस्तपुराण’कार फादर थॉमस स्टीफन्स, मराठी मुद्रणकलेचा पाया घालणारे रेव्ह. विल्यम कॅरी, मराठीतील आद्य कादंबरीकार बाबा पद्मनजी, ‘स्मृतिचित्रे’ लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक, मराठी पंचकवींपैकी एक असलेले रेव्ह. नारायण वामन टिळक, मूळ हिब्रू आणि ग्रीक भाषांतून बायबल मराठीत आणणाऱ्या पंडिता रमाबाई अशी खूप मोठी यादी देता येईल. मात्र यापैकी कुणाच्याही साहित्यातून खास मराठी ख्रिस्ती समाजजीवनाचे व भावनांचे प्रतिबिंब उमटते, असे म्हणता येणार नाही.

कार्व्हालो या वसईतील ख्रिस्ती कुटुंबात वाढल्या. ख्रिस्ती धर्माच्या संस्कारांत त्यांची जडणघडण झाली. ख्रिस्ती मंदिरांतील अनेक चालीरीतींत आणि सांक्रामेंतांत सहभाग घेत असतानाच यापैकी काही कालबाह्य रूढी-परंपरांशी त्यांनी फारकत घेतली. शाळेत शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या कार्व्हालो काही वर्षांपूर्वी वसईतील सेंट गोन्सालो गार्सिया कॉलेजच्या प्राचार्या म्हणून निवृत्त झाल्या. लहानपणापासून अलीकडच्या काळापर्यंत कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक आणि भावनिक विश्वांतील अनेक प्रसंगांना कार्व्हालो यांनी आपल्या आत्मचरित्रात शब्दबद्ध केले आहे. ख्रिस्ती समाजजीवनाविषयी, चालीरीतींविषयी आणि श्रद्धांविषयी पूर्णतः अनभिज्ञ असणाऱ्या महाराष्ट्रातील बहुसंख्य समाजाला आणि मराठी वाचकांना हे ३३२ पानांचे पुस्तक एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते.

कार्व्हालो यांनी समाजजीवनातील बदलांबरोबरच चर्चमधील बदलांचीही या पुस्तकात नोंद घेतली आहे. १९७०च्या दशकापर्यंत जगभर चर्चमध्ये लॅटिन भाषेत मिस्साविधी आणि प्रार्थना व्हायच्या. १९६०च्या दशकात भरलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेने सुधारणा अंमलात आल्याने सगळीकडे स्थानिक भाषांत धार्मिक विधी होऊ लागले. लेखिकेने लिहिले आहे – “आम्ही चर्चमध्ये जात असू, तेव्हा लॅटिन भाषेतून धार्मिक विधी चालत. धर्मगुरू त्यांची भरजरी वस्त्रे घालून वेदीकडे तोंड व लोकांकडे पाठ करून मिस्साबलिदान साजरे करत. ते वेदीवरील देवाशी पुटपुटत, लॅटिनमध्ये ते काय बोलतात तेच कळत नसे. पण त्या भाषेतला गोडवा आणि संगीत आपले लक्ष विचलित होऊ देत नसे. ‘सांतुम... सांतुम... सांतुम...’ असे शब्द उच्चारताच सारे वातावरण ‘पवित्र’ होऊन जात असे.”

वरील वर्णन केवळ वसईतील चर्चलाच नाही, तर १९७०च्या आधीच्या जगभरातील सर्वच चर्चमधील भाविकांसाठी लागू होईल.       

मात्र लॅटिन भाषा समजत नसली तरी भक्ताचा भाव महत्त्वाचा, तो कोणती प्रार्थना म्हणतो ते महत्त्वाचे नाही, हे लेखिकेने ‘टोपल्यावर टोपली, शंभर टोपली’ अशी प्रार्थना म्हणणाऱ्या एका साध्या बाईचे उदाहरण देऊन सांगितले आहे. आश्चर्य म्हणजे परमेश्वराने तिची प्रार्थना ऐकली आणि तिला हवे ते मिळाले, असे सांगून कार्व्हालो लिहितात – “तात्पर्य, असे की, कोणी अडाणी असो की, पंडित पण मनापासून केलेली प्रार्थना महत्त्वाची. मनातला भाव महत्त्वाचा. भाषा महत्त्वाची नाही.”      

वसईच्या आपल्या ख्रिस्ती घरातील धार्मिक वातावरण, नियमितपणे कम्युनियन आणि कुमसार (प्रायश्चित किंवा कन्फेशन) घेण्याबद्दल मनावर झालेले संस्कार याबद्दल लेखिकेने लिहिले आहे. नियमितपणे चर्चला जाणारे मुले-मुली नंतर ‘फादर’ (धर्मगुरू) आणि ‘सिस्टर’ (धर्मभगिनी किंवा नन) होऊ शकतात, अशी भावना त्या काळात केवळ वसईतच नव्हे, तर जगभरातील सर्वच धार्मिक ख्रिस्ती समाजात असायची. धार्मिक कुटुंबातील पालक आपले एकतरी मूल फादर किंवा सिस्टर व्हावे अशी इच्छा बाळगत असत. कार्व्हालो यांनी आपणही एकेकाळी नन होण्याचा विचार केला होता, असे लिहिले आहे. मात्र नंतर त्यांनी आपला विचार बदलला आणि शैक्षणिक क्षेत्रातील कारकीर्द निवडली. ‘सुवार्ता’ मासिकाचे त्यावेळचे संपादक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी याबाबत दिलेल्या एका सल्ल्याने आपले मतपरिवर्तन झाले असे कार्व्हालो यांनी लिहिले आहे. “नन झालीस तर दिवसभराच्या नेमून दिलेल्या कामाच्या व्यापात तू तुझी लेखनातली निर्मितीशीलता गमावून बसशील,” असे फादर दिब्रिटोंनी त्यांना सांगितले होते.

लहानपणी चर्चमधील मिस्सेला दररोज जाणे, नंतर दर रविवारी आणि सणासुदीला जाणे वगैरे धार्मिक प्रथा पाळण्यापासून आपल्या आणि वसईतील इतरांच्याही सामाजिक व धार्मिक जीवनांत झालेले बदल कार्व्हालो यांनी टिपले आहेत. 

एके ठिकाणी त्यांनी लिहिले आहे - ‘‘दारासमोरच्या कुडीत दोन डुकरे होती. घरातलं उरलंसुरलं किंवा भाताची पेज यात कुंडा कालवून आय डुकरांना घालीत असे. घराघरात डुक्करपालनाचा जोडधंदा होता. ज्यांच्या घरी डुकरं नसत ते त्यांच्या घरातली भाताची पेज शेजाऱ्यांना देत वा कधी शेजाऱ्यांकडून मागितली जात असे. काही बाया तर दारोदार पेज मागत फिरत असत. सणावाराला, लग्न व इतर सोहळ्यांसाठी डुकर मारणे हे प्रतिष्ठेचे समजले जाई.”

हे वाचल्यावर गोव्यात आमच्या हॉस्टेलमध्ये दिवसातून दोनदा भाजीपाल्याचा टाकून दिलेला भाग आणि खाद्यपदार्थांचा उरलेला भाग मोठ्या डब्यातून नेणारा आमचा शेजारी ख्रिसमसला व ईस्टर सणाला आमच्यासाठी खास वेगळे डुक्कर आम्हाला आधी दाखवून राखून ठेवत असे आणि या डुकरांच्या मांसापासून बनवलेले विंदालू आणि सोरपोतेल आणून देत असे, हे आठवले.       

“सणावाराच्या दिवशी बहुतेक घरात डुक्कर, कोंबडीचे मटण शिजत असे. इंदियाला, सरपोतेल, टेपरात असे विनीगर घालून तयार केलेल्या डुकराच्या मटणाच्या पदार्थांच्या वासावर सारा गाव झुलत असे,” हे कार्व्हालो यांनी केलेले वर्णन वाचले आणि गोव्यात सणावारानिमित्त अत्यंत लोकप्रिय असलेल्या खास पोर्तुगीज वळणाच्या भरपूर तेल आणि मसाले घालून रटरट शिजवलेल्या विंदालू, सोरपोतेल आणि भरपूर नारळ घालून केलेल्या चिकन आणि बिफ शाकुतीची आठवण आली. वसईतील ख्रिस्ती समाज हा मराठी समाजाचाच एक भाग असला तरी ही खाद्यसंस्कृती तशी मराठी समाजाला पूर्णपणे अनोळखी आहे.

कार्व्हालो २०००मध्ये नाशिक येथे भरलेल्या अठराव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांदरम्यान झालेल्या अनेक वादांबाबत कार्व्हालो यांनी परखड भूमिका घेतली. त्याबाबत त्या म्हणतात – “एकमेकांच्या विषयीचा आकस आणि मनाचा कोतेपणा व संकुचितपणा सोडून देण्याचीही आवश्यकता असते. त्यासाठी पुढे येऊन स्पष्ट आणि सत्य बोलण्याचीही गरज असते. ते काम अनेकदा मला करावे लागले आणि ख्रिस्तविचाराच्या पावलावर पाऊल टाकून आपण चाललो आहोत, याची जाणीव तीव्र होत गेली. तीही कोणा ‘गॉडफादर’विना!”

कार्व्हालो हे नाव असलेली ख्रिस्ती महिला मराठी कशी बोलते, मराठीत कविता आणि इतर लिखाण कशी करते, याचे महाराष्ट्रातील अनेकांना कायम आश्चर्य आणि अप्रूप वाटत आले आहे. त्याविषयी कार्व्हालो लिहितात – “आम्हा वसईतील कॅथॉलिकांची नावं पोर्तुगीज होती. त्यामुळे आम्हाला मराठी बोलता येत नाही असे लोकांना वाटे. कुठेही गेलं तरी इंग्रजीत बोलायला सुरुवात करत आणि आम्हाला तर इंग्रजीही धड येत नसे.”

एकदा कार्व्हालो नाशिकला काव्यवाचनाला गेल्या होत्या, तेव्हा एक बाई आपल्या शाळकरी मुलीला घेऊन त्यांना भेटायला आल्या. ‘ख्रिस्ती लोकांना मराठी येते का?’ असा प्रश्न त्यांनी केला. तेव्हा कार्व्हालो म्हणाल्या- ‘‘धर्म आणि भाषा यांचा संबंध काय? कोणत्याही धर्माच्या कोणीही, कोणतीही भाषा, बोलायला- शिकायला कसलेही बंधन नाही.’’ हे ऐकताच ती शाळकरी मुलगी एकदम गांगरली. ती मुलगी आणि तिची आई एकदम ‘मॉडर्न’ वाटत होत्या आणि मी साडी नेसलेली, कपाळावर कुंकू लावलेली, केसाचा अंबाडा घातलेली अशी ‘काकूबाई’ दिसत होते.”

वसई येथील आपल्या वाडवळी बोलीभाषेतील अनेक शब्दांचा, संज्ञांचा आणि वाक्प्रचारांचा कार्व्हालो यांनी या आत्मचरित्रात भरपूर वापर केला आहे. ‘टिपंवणी’ या शीर्षकाविषयी त्या लिहितात – “ ‘टिपं’ म्हणजे थेंब आणि ‘वणी’ म्हणजे ‘पाणी’. ‘टिपंवणी’ म्हणजे थेंब थेंब पाणी. तसेच ‘टिपं’ म्हणजे अश्रूंचे थेंब. थेंबाथेंबाने अश्रू ढाळणे म्हणजे  ‘टिपं’ गाळणे. प्रतिभाशक्तीने जे देणं-लेणं दिलं, त्याचं विविध प्रकारचं साहित्य झालं आणि हृदयात जे साचलं होतं, साचत राहिलं, किंबहुना पाण्यासारखं वळत राहिलं ते ‘टिपंवणी’त मांडावंसं वाटलं. या साऱ्या आठवणी डोळ्यात पाणी आणणाऱ्या आणि पाणीदार अशाही !”   

जगभरातील ख्रिस्ती समाज एकजिनसी आहे, असा काहींचा गैरसमज असतो, मात्र त्यात तथ्य नाही. ख्रिस्ती समाजात कितीतरी पंथ आहेत, त्यापैकी मी स्वतः केवळ दहा-बारा नावेच सांगू शकेल. भारतात तर सर्वच राज्यांमध्ये जातिव्यवस्थेने ख्रिस्ती समाजाचीही अनेक शकले केली आहेत. वसईतील ख्रिस्ती समाज त्याला कसा अपवाद असू शकेल? कॉलेजच्या प्राचार्यपदावरचा आपला हक्क एकदा डावलला गेला होता, याचे कारण म्हणजे ‘सामवेदी ख्रिस्ती आणि वाडवळ ख्रिस्ती हा भेद आडवा आला’ असे त्यांनी लिहिले आहे.   

ख्रिस्ती साहित्यिकांनी केवळ ख्रिस्ती विषयच हाताळावे की, इतर विषयांत सखोल अभ्यास करावा, याविषयी कार्व्हालो यांनी केलेली एक मार्मिक टिपणी मला आवडली. त्या लिहितात – “काही विषय दुर्लक्षित राहतात म्हणून ख्रिस्ती संशोधकांनी ख्रिस्ती समाजातील लेखकांकडे आणि त्यांच्या साहित्याकडे वळावे हे खरे आहे. परंतु फादर डलरी, फादर मॅथ्यू लेदर्ले, फादर कामिल बुल्के यांच्यासारखे अनेक धर्मगुरू जसे हिंदू दैवतांचा अभ्यास करण्याकडे वळले, तसा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन बळावयाला हवा. अनेक मराठी संशोधकांनी अत्यंत तर्कशुद्धपणे ख्रिस्ती धर्मीय मराठी लेखकांच्या साहित्यावर संशोधनात्मक मांडणी केली आहे.”

‘टिपंवणी’ लिहून कार्व्हालो यांनी ख्रिस्ती धर्मातील एक वेगळी बोलीभाषा आणि भिन्न चालीरीती असणाऱ्या एका छोट्याशा समूहाची ओळख करून दिली आहे. हे आत्मचरित्र सामाजिक इतिहासाचा आणि धार्मिक, सांस्कृतिक स्थित्यंतराचा ऐवज आहे.    

‘टिपंवणी’ - डॉ. सिसिलिया कार्व्हालो

ग्रंथाली, मुंबई

पाने - ३३२, मूल्य - ४०० रुपये.






Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

A day at Mother Teresa’s Home for Destitutes

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction